येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

धान विक्रीत मुदतवाढ मिळालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ


विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई, दि.२८: विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत केंद्र शासनाच्या वतीने ३० एप्रिलपर्यंत वाढवून आली असून ३० एप्रिलपर्यंत धान विक्री करणाऱ्या विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.त्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विदर्भात यंदाच्या वर्षी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून धानासाठी १८०० रुपये हमीभाव आणि त्यावर ७०० रुपये प्रोत्साहन पर राशी दिली आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळाल्याने विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे पाठ फिरवली. शेतकरी मोठ्या प्रमाणात धान शासनाच्या खरेदी केंद्रावर घेऊन येत होते.मात्र कोरोनामुळे त्यांची गैरसोय झाली होती. शासनाकडून सुरू असलेली धान खरेदी दि.३१  मार्च २०२० पर्यंत सुरू राहणार होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान उपलब्ध असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही मुदत अधिक वाढवून मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडून धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्च पर्यंत असलेली मुदत एक महिना वाढवून देत ती ३० एप्रिल २०२० पर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिल्यामुळे दि.३० एप्रिल पर्यंत धान विक्री करणाऱ्या विदर्भातील धान उत्पादन शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने धानासाठी ठरवून दिलेला १८०० रुपये हमीभाव आणि त्यावर अधिक ७०० रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा